भिवंडी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारीपदी राजेश शर्मा यांची नियुक्ती
- महेंद्र कुमार (गुडडू), ब्यूरो चीफ भिवंडी
- Sep 09, 2025
- 159 views
ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी राजेश शर्मा यांच्या कार्याचे केले कौतुक
भिवंडी। 2017 मध्ये झालेल्या भिवंडी नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमत मिळवून देणारे निवडणूक प्रमुख तथा काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश शर्मा यांना भिवंडी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी पदी नियुक्त करून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा राजेश शर्मा यांच्यावरच विश्वास दाखवला आहे. याआधी राजेश शर्मा हे ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी म्हणून कार्यरत होते.ठाणे ग्रामीण मध्ये त्यांनी संघटन वाढीसाठी प्रभारी म्हणून केलेल्या कार्याचे ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी कौतुक केले असून ठाणे ग्रामीण जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या ॲड .अभयच्या छाजेड यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकताच जिल्हा प्रभारी व विधानसभा प्रभारी जाहीर केले असून, ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे प्रभारी असलेले मुंबईचे माजी उपमहापौर व प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजेश शर्मा यांची भिवंडी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रदेश काँग्रेसचे खजिनदार ॲड अभय छाजेड यांची ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटी प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राजेश शर्मा हे 2017 मध्ये झालेल्या भिवंडी नगरपालिका निवडणुकीमध्ये निवडणूक प्रमुख होते. त्यांनी 90 पैकी 47 नगरसेवक निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्यांची भिवंडी शहरातील उत्तर भारतीय समाजातील लोकप्रियता लक्षात घेऊन पुन्हा एकदा भिवंडी नगरपालिका काँग्रेस पक्षाने जिंकण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राजेश शर्मा यांच्यावरच विश्वास दाखवून त्यांना थेट जिल्हा प्रभारी नियुक्त केल्याने भिवंडी मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. राजेश शर्मा यांनी मुंबईचे उपमहापौर म्हणूनही काम पाहिले असून ते यापूर्वी ठाणे ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या जिल्हा प्रभारी पदी कार्यरत होते. ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील संघटन वाढीसाठी त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम राबवून संघटन उभारणीस हातभार लावला होता. दयानंद चोरघे यांच्या सोबतीला त्यांनी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवून पक्ष संघटन वाढवले होते ,अशा संघटन प्रिय व्यक्तिमत्वास जिल्हा प्रभारी करून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व भिवंडी काँग्रेसने भिवंडी महानगरपालिका जिंकण्यासाठी कंबर कसल्याचे दिसून येत आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाने राजेश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी महानगरपालिका पुन्हा एकदा काँग्रेसच जिंकेल तर ठाणे ठाणे ग्रामीण जिल्हा प्रभारी अभय छाजेड यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्ष दमदार एन्ट्री करेल असा विश्वास ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान राजेश शर्मा यांची भिवंडी शहर जिल्हा प्रभारी म्हणून तर ॲड .अभय छाजेड यांची ठाणे ग्रामीण जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर भिवंडी शहर व ठाणे ग्रामीण मधील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.


रिपोर्टर