
रक्तदान शिबिर राष्ट्रीय उत्सवाप्रमाणे आयोजित करण्याची गरज - आमदार विश्वनाथ भोईर
- Rohit R. Shukla, Journalist
- Oct 27, 2024
- 138 views
मोहोन्यातील मैत्री प्रतिष्ठानतर्फे गेल्या 10 वर्षांपासून उपक्रम
कल्याण । काळाची पावले ओळखून येत्या काळात रक्तदान शिबिरे ही राष्ट्रीय उत्सवाप्रमाणे आयोजित करण्याची गरज कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांनी व्यक्त केली. कल्याणजवळील मोहोने परिसरात गेल्या दहा वर्षांपासून मैत्री प्रतिष्ठानतर्फे आयोजित रक्तदान शिबिराला आमदार भोईर साहेब यांनी भेट दिली.
एनआरसी शाळेतील १९९६ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेले मैत्री प्रतिष्ठानचे रोपटे यंदा ११ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. मैत्री फक्त एकमेकांपर्यंत मर्यादित न ठेवता जिथे जन्मलो, वाढलो आणि घडलो त्या परिसरासाठी काहीतरी करण्याच्या धडपडीतून आणि सामाजिक बांधिलकी जपत २०१४ मध्ये हे रक्तदान शिबिराला प्रारंभ झाला.
केवळ रक्तदान शिबिरापुरता मर्यादित न राहता मैत्री प्रतिष्ठानतर्फे परिसरातील शाळांना भरीव मदत, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, प्रबोधनपर कार्यशाळा- व्याख्यान, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत, वृक्षारोपण, पुरग्रस्त कुटुंबांसाठी मदत असे अनेक सामाजिक उपक्रमही राबवण्यात आले.
रक्तदान शिबीर हा यापैकी एक महत्त्वाचा उपक्रम असून या माध्यमातून मैत्री प्रतिष्ठानने वेळोवेळी गरजू रुग्णांसाठी रक्ताचा साठा उपलब्ध करून दिला आहे.
याप्रसंगी उपशहर प्रमुख अंकुश जोगदंड, शाखाप्रमुख रोहन कोट, राजा पाटील, मैत्री प्रतिष्ठानांचे अध्यक्ष सचिन घाडगे, युवासेना शहर प्रमुख दिनेश निकम, राकेश पाटील, हरिद्वार पाटील, चेतन बळुरगी यांच्यासह अनेक पदाधिकारी व रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते
रिपोर्टर